आमच्या गावी वाहतुकीची सोय म्हणून एक 'वडाप' नावाचा प्रकार आहे. वडाप म्हणजे काळ्या-पिवळ्या रंगाने नटलेली आणि प्रवाशांनी खचून भरलेली जीप-गाडी!आता 'वडाप-गाडीची' व्याख्या स्पष्ट करण्यामागे एक गोड कथा आहे; पेठ नाका ते 32 शिराळा प्रवासाची!
तर झालं असं की, त्या दिवशी मी 32 शिराळ्याला निघालो होतो. माझ्या तिथल्या एका मित्राच्या गावी गुढीपाडव्याची जत्रा होती. आता, चांगल्या हुद्द्यावर आणि चांगल्या कंपनीत कामाला असल्यामुळे, देवाच्या कृपेने माझ्याकडे चार चाकी होती! अगदी आलिशान! चकचकीत! परंतु, त्या दिवशी माझ्या त्या मध्यम वर्गीय आलिशान गाडीची 'वडाप-गाडी' झाली होती आणि मी त्या गाडीचा खचून माणसं भरणारा ड्रायव्हर!
तर पुन्हा एकदा, झालं असं की, पुण्याहून पहाटेच आपलं मी शिराळ्याच्या दिशेने निघालो होतो. निघताना, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारात जातोय, म्हणून आईने माझ्या नावाने दोन शिव्या न्याहारीला बांधून दिल्या होत्या. दोन-अडीच तासांचा पाठमोडी प्रवास झाल्यानंतर, पेठ नाक्यावर येताच माझ्या गाडीच्या मागच्या टायरने वेदनेने व्याकूळ अशी जोराची हाक मला मारली. मी सुद्धा लगेच ब्रेक दाबत हाकेच्या दिशेने पाहिलं; गाडीचा मागचा टायर अंगातली सगळी ताकद गेल्याने कण्हत होता! बहुदा, निघताना आईने सोबत दिलेल्या दोन शिव्यांपैकी एक शिवी त्याने खाल्ली असावी!
असो... आता टायरची मलमपट्टी करायची म्हणून मी मेकॅनिकला बोलावलं. त्यानं त्याचं काम सुरू केलं. तो त्याच्या कामात गुंतून गेला आणि मी गाडीत बसून पेपर वाचू लागलो. तेव्हा सहज माझी नजर आरश्यात गेली. मागून एक आजी, गाडीच्या डिकीजवळून माझ्याकडे वाकून बघत होत्या. गाडीकडे कुतूहलाने बघत असतील, असं समजून मी दुर्लक्ष केलं. पण, थोड्या वेळाने त्या मागच्या दाराकडून पुढच्या दाराकडे आल्या. अगदी बाजूला येऊन उभ्या राहिल्या. मी थोडा दचकलोच!
"काय हो आजी, काही हवंय का तुम्हाला?" बोलायचं म्हणून मी आपलं बोलून गेलो.
"कुटं काय तवा? न्हाय बाबा." असं बोलून त्यांनी मान फिरवली.
"मग, मगापासून तुम्ही माझ्याकडे का बघताय?" पेपर बाजूला ठेवत मी म्हणालो.
"ते व्हय? ते, तू..." आजी अडखळल्या.
"घाबरू नका आजी, बोला." मी त्यांना धीर दिला.
"तू, ते, कुटं निगाला?" मोठ्या धीराने त्यांनी मला विचारलं.
"शिराळ्याला जातोय, का हो आजी?" गाडीतून बाहेर पडत मी त्यांना विचारलं.
"ते, मला बी तिकडंच जायचं हुतं!" आजींनी इच्छा व्यक्त केली.
"चला की मग माझ्या सोबत." उगाचच विषय न ताणता मी त्यांच्या मनातल्या विषयाला हात घातला.
"न्हाय म्हंजी, चालंल नौका तुला? त्यांनी माझी परवानगी मागितली.
"अहो, चालायचं काय त्यात? या की सोबत." मी होकार दिला.
माझी परवानगी मिळताच आजी धावत त्यांचं सामान आणायला गेल्या. तोवर मी मागचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडून ठेवला आणि जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसलो.
मागून लगेच आजीबाई आल्या आणि पुढचा दरवाजा खाडकन उघडून धाडकन बसल्या!
"आजी, अहो मागे बसा. इथे अडचण होईल तुम्हाला बसायला." सीट बेल्ट लावत मी त्यांना म्हणालो.
"आता मागं आनी कुटं बसू? जागा कुटाय तवा!" आजींनी पदराने कपाळावरचा घाम पुसत मला उत्तर दिलं.
"का? मागे आहे की जागा." असं म्हणत, मी आपलं सहजच मागे वळून पाहिलं, तर आजी बाईंची चार नातवंडं एका रांगेत मागच्या सीट वर बसली होती! त्यातला एक मुलगा कुल्फी खात होता. बरं, त्याची कुल्फी नाकातल्या शेंबडाला हलकासा स्पर्श करून मगच तोंडात जात होती. दुसरा मुलगा हाताच्या पाच बोटांमध्ये नळ्या भरून, त्या कुरकुर आवाज करत खात होता. तिसरी लहान मुलगी, ती चौथ्या मुलीच्या मांडीवर बसून खिडकीतून बाहेर डोकावत होती. तर, ती चौथी मुलगी गाडी सुरू होण्याआधीच मळमळायला लागल्यामुळे डोकं धरून बसली होती.
आता बोलून काही फायदा नव्हता. आजीबाईंनी कोणतीही पूर्वकल्पना न देता एवढं मोठं बिऱ्हाड गाडीत आणून बसवलं होतं. थोड्या वेळाने मेकॅनिकने ग्रीन सिग्नल दिला. मी त्याचे पैसे चुकते करून गाडीला चावी दिली. गाडी सुरू झाली तशी आजी बाईंची अखंड बडबड देखील सुरू झाली!
"व्हय ओ पावनं, ऱ्हायला कुटं तुमी?" पदराची गाठ सोडत, त्यातली तपकिरीची डबी बाहेर काढत आजींनी मला पहिला प्रश्न केला.
"पुण्यात, पुण्यात राहतो मी." आरशातून मागच्या सीटवरच्या परिस्थितीचा अंदाज घेत मी उत्तर दिलं.
"चांगलं हाय. मी, ते हिकडं, माजी धाकली पोरगी दिल्या ना कराडात, पाटलाच्यात. तिच्याकडं गिलती. ही दोन पोरं तिचीच हायत." असं बोलत आजी बाईंनी तपकिरीत बुडवलेलं बोट तोंडात घातलं आणि त्याच्या वासाने मला शिंका यायला सुरुवात झाली.
"आजी, गाडीत तपकीर लावू नका, मला त्रास होतो." नाक चोळत मी आजींवर हलक्या स्वरात ओरडलो.
"माफ कर पोरा. ते, तपकीर लावायची सवय हाय ना मला. त्यामुळं कसं, ती न्हाय लावली, तर जमत न्हाय बग मला." आजींनी एकदम सगळी तपकीर दातांना चोळून, उरलेली खिडकीतून बाहेर झाडून टाकली. ती उडून मागच्या सीटवरच्या मुलीच्या नाकात जाऊन, ती देखील शिंकायला लागली.
आजींचा तपकिरीचा कार्यक्रम संपला तोच मागच्या सीट वर झोपलेल्या चौथ्या मुलीने तिचा कार्यक्रम सुरू केला. ती अचानक उठली आणि खिडकीतून उलटी करू लागली. तो प्रकार पाहून पहिल्या शेंबडया पोराने आधीच घाण झालेलं तोंड अजून घाण केलं. तिच्याकडे पाहून मला थोडी दया आली, म्हणून मी गाडी थांबवली. मुलगी खाली उतरली. तिला मी पाणी दिलं. तिने तोंड धुतलं, चूळ भरली आणि परत येऊन गाडीत बसली. पोरीला बरं वाटावं, म्हणून आजींनी तिला आवळा सुपारी खायला दिली. तिने ती खाल्ली आणि डोकं टेकून झोपी गेली. गाडी पुन्हा सुरू झाली. आजींनी आता एक-एक करून मागे बसलेल्या मुलांची माहिती सांगायला सुरवात केली.
"ते, माझ्या मोट्या पोराचं लगीन ठरलंय ना, म्हनून धाकट्या आणि थोरल्या लेकीच्या पोरास्नी फूडं घिऊन चालल्या."
आजींनी बोलायला सुरुवात केल्यावर, मी फक्त "हा" आणि "हम्मम" एवढ्याच उत्तरांदाखल संवाद सुरू ठेवला.
"ही दोन धाकटीची आणि या दोन पोरी थोरलीच्या. पोरं लय गुनाची हायत बगा. माझी थोरली पोरगी हाय कनाय, तिला सांगलीत दिल्या, जाधवाच्यात. ती परवा या पोरीस्नी धाकटीकडं सोडून गेली. म्हनली पोरीस्नी फूडं घिऊन जा, मी इती मागनं. माझी थोरली पोरगी लय कष्टाची बगा. लय तरास सन केलाय बगा तिनं. एवडा सासुरवास झाला, पन कदी एका शब्दानंपन बोलली न्हाय बगा मला ती."
बोलता बोलता आजींना हुंदका आला, त्यांनी तो लगेच पदराने दाबला. मला थोडं वाईट वाटलं, म्हणून मी आजींजवळ त्यांच्या मुलीची विचारपूस केली.
"मग, आता कशी आहे, तुमची थोरली मुलगी?"
"आता बारी हाय बगा! ते, मदी घराच्या वाटन्या झाल्यापासनं तिची सासू थोरल्या पोरकडं ऱ्हाती, म्हनून चांगलं चाल्लंय!" एवढं बोलून आजी शांत झाल्या आणि खिडकीतून बाहेर बघू लागल्या.
आजींच्या बोलण्याची मला गंमत वाटत होती. अगदी मन मोकळं करून त्या माझ्याशी बोलत होत्या. त्यांच्या कष्टाच्या शरीरावर सुरकुत्या पडलेलं लुगडं चांगलंच जुनं दिसत होतं. त्यांनी कपाळावर एक रुपयाच्या आकाराचं कुंकू अगदी ठळक लावलं होतं. त्याच्यावर घामाची धार आल्यामुळे ते कुंकू सरळ खाली नाकावर आलं होतं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्यांचे आजवरचे कष्ट मोजून सांगत होत्या. जागोजागी खिळे मारलेली कोल्हापुरी चप्पल आजींच्या आजवरच्या सुख-दुःखाच्या अनुभवी पावलांचं गणित मांडत होती.
"आजी, तुम्ही शेती करता?" मी आपलं विचारायचं म्हणून सहज विचारलं.
"करतू की! न्हाय करायला काय झालं? चार एकर शेती हाय माजी! एकिकडं जोंधळं, एकीकडं मका, आणि लावला तर भुईमूग बी पिकतोय..."
"अरे वा! यायला पाहिजे एकदा तुमच्या शेतात!" मी उत्साहाने बोललो.
"या की मग! चार कनसं खाऊन आनी घिऊन जावा, पोरास्नी!" आजींनी आनंदाने आमंत्रण दिलं.
"होय, येईन, नक्की येईन." मी लगेच होकार दिला. आजी पुढे बोलू लागल्या.
"माझा नवरा फौजी हुता! पन, आज पंधरा वरीस झालं, घरीच बसून हाय."
"का? म्हणजे, काय झालंय त्यांना? आजारी असतात का ते?" मी काळजीने आजींना विचारलं.
"ते, लडाई झाली हुती बार्डर वर, तवा त्यांचं दोनी हात त्यात गेलं! मग आता, हातच न्हाईत म्हनल्यावर काम तरी कसं करणार?"
"बाप रे! मग तुम्ही एकट्याच एवढी शेती करता?" मला आश्चर्य वाटलं!
"न्हाय, न्हाय, थोरला पोरगा असतो की हाताला. लय जीव हाय बगा त्याचा आमच्यावर. आता जे काय घर, जमीन-जुमला हाय, त्यो समदा त्याचाच हाय बगा. फूडं त्याचा त्यो बगील, काय करायचं ते." आजी खिडकीतून बाहेर बघू लागल्या.
"होय, ते तर आहेच."
मी आरशातून मागच्या सीट वर पाहिलं. चारही मुलं झोपी गेली होती. बघता-बघता आम्ही शिराळ्यात पोहोचलो. आजींना त्यांचा पत्ता विचारून, मी गाडी त्यांच्या घरासमोर नेली. प्रवासात पाय अवघडल्यामुळे आजी सावकाश गाडीतून उतरल्या. त्यांनी मुलांना झोपेतून उठवलं आणि गाडीतून उतरायला सांगितलं. आजींनी त्यांच्या पाकिटातून पन्नास रुपयांची नोट काढली आणि माझ्या हातात ठेवत त्या म्हणाल्या,
"हे घे पोरा."
"अहो आजी, पैसे कशाला देताय? ठेवा ते पैसे परत." मी थोडा हक्काने त्यांच्यावर ओरडलो.
"आसं कसं पोरा? एवढ्या लांबनं तू आमाला घिऊन आलास. आणि गाडी काय फुकट चालती व्हय? त्याल लागतंयच की तिला, त्याचंच हे पैसं. घे, घे न्हायतर नंतरच्या येळला तुज्या गाडीत बसनार न्हाय बग! घे म्हनतूया न्हवं. ठेव, असुदे." आजींनी जबरदस्तीने ती पन्नास रुपयांची नोट माझ्या शर्टाच्या खिशात कोंबली.
"आनी ऐक, ते शेतात यशील तवा यशील, आदी घरला चल, जेऊन जा." आजींनी आग्रह करायला सुरुवात केली.
"नाही नको आजी, आता उशीर होतोय, पुन्हा कधीतरी मी नक्की येईन तुमच्याकडे, खरंच..." मी त्यांना आश्वासन दिलं.
"नक्की यशील नौका?"
"होय आजी, नक्की येईन."
"ये रं पोरा, नक्की ये. दुसरं काय हाय सांग मला आयुष्यात? असंच चार चांगली माणसं राकुन असायचं बग. भेटायचं एकमेकास्नी. आपल्या मानसांशिवार दुसरा दागिना हाय का सांग बरं मला? ये आठवनीनं, काय?" आजींनी बजावून मला सांगितलं.
"होय आजी, नक्की येणार मी तुमच्याकडे. बरं चला, येतो मी. काळजी घ्या." असं बोलून मी आजींचा निरोप घेतला.
खरं सांगू? त्या संपूर्ण प्रवासात, आजींनी दिलेली ती पन्नास रुपयांची नोट, दर महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा मला मोठी वाटत होती...
- अक्षय पाटील
कथा आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...